आमचे माजी अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पक्षाशी गद्दारी करुन भाजपा मध्ये प्रवेश केला. खरतरं हे ते करणारच होते ही काळ्या दगडावरची रेघ होती. कारण त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही अध्यक्षाला व कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नाही. त्यावरुन ते जाणार याची कुणकुण सर्वसामान्य कार्यकर्त्याला लागली होतीच. पक्षाने एवढ सगळं देऊन सुद्धा जेव्हा लोक गद्दारी करतात तेव्हा काल प्रदेश अध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब जे म्हणाले तेच सत्य आहे. ‘लायकी पेक्षा जास्त मिळाल कि त्याची किंमत नसते’.
कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव यापेक्षा काही वेगळी ओळख त्यांची नव्हती. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हि पदे भूषवताना त्यांनी आक्रमकपणे सत्ताधा-यांवर हल्ला केला असे एकही उदाहरण समोर येत नाही. कारण वडीलांमुळे सत्ताधारी असो नाहीतर स्वपक्षीय असो, सगळेच “काका” मग काकांसमोर पुतण्या आक्रमक कसा होणार. मग सगळ्यांनीच कौतुक करायच… कि तो स्वभावाने खुप शांत आहे, शालीन आहे. पण, एका पक्षासाठी जेव्हा आपण लढत असतो तेव्हा दुस-या पक्षाशी दोन हात करायची जर तयारी नसेल तर सगळीकडेच तुमचे “काका” असतील. पण, ह्या सार्वत्रिक पुतण्याने पक्षासाठी काय केल? याचा हिशोब तरी त्याने जाताना द्यायला हवा होता.
पवार कुटुंबियांनी एवढं भरभरुन दिल्यानंतर थातुर-मातुर कारणे देत पक्ष सोडण हे हास्यास्पदच होत. त्यांनी ज्या व्यक्तीवर टिका केली त्या जितेंद्र आव्हाडांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने बघितला आहे. पवार कुटुंबियांसाठी, पक्षासाठी, तत्वासाठी आणि विचारधारेसाठी जिवाचीही पर्वा न करणारा हा कार्यकर्ता आहे. याची वेगळी ओळख मी कोणाला करुन द्यायला नको. त्यांच्या तुलनेत एक टक्का तरी आपण काय केले असेल तर याची माहिती महाराष्ट्राला द्यावी. निवडणूकीची गणिते लावत स्वार्थासाठी पक्ष सोडायचा, साहेबांना जाऊन खोटं सांगायचं, सहानुभूती मिळवायची. असे निंदनीय प्रकार करणारे आपल्या राजकीय आयुष्यात कितपत यशस्वी होतील हे माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सांगू शकत नाही.
निष्ठाची विष्ठा करणा-या असे निरुपयोगी कार्यकर्ते हे पक्षातून बाहेर जातील तेवढेच बरे. कारण ते करणार काहीच नाहीत… पण, घेणार भरभरुन. यांना पद-प्रतिष्ठा-सन्मान देण्यापेक्षा सर्वसामान्यांना दिला तर तो पक्षाला अधिक जोमाने मदत करतो आणि यांच्यासारखी गद्दारी तरी करणार नाही. कोणी काहीही म्हणो साध्या भाषेत निरंजनने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पवार कुटुंबियांशी गद्दारी केली.