नवी मुंबई – पांडव कड़ा येथे गेलेल्या 8 पर्यटकांवर दोन गुन्हे भा.दं.वि. 188 अन्वये खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पांडव कड़ा येथे पावसाळ्या मध्ये खुप पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी भरते.यापूर्वी सन 2014 ते 2017 या कालावधी मध्ये सुमारे 8 ते 10 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यु झालेला आहे.
यावर्षी कोणत्याही प्रकारे जीवित हानी होऊ नये म्हणून पांडवकडा परिसर पोलिसांकडून Crpc 144 अन्वये प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत खारघर तसेच पांडव कड़ा परिसरात बॅनर,पोस्टर्स तयार करुन लावण्यात आलेले आहे.तसेच सदर परिसरात पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात येतो. परंतु काही पर्यटक या सर्वाना न जुमानता पांडव कड़ा येथे प्रवेश करतात .
आज खारघर पोलिस स्टेशन येथे मनाई आदेशाचा भंग करणा-या पर्यटकांवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकुण 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यातील 5 जण नवी मुंबई तर 3 जण मुंबईचे रहिवाशी आहेत. पांडवकडा परिसर अतिशय धोकादायक असल्याने तेथे जाऊ नये असे आवाहन प्रदीप तिदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर पोलीस ठाणे यांनी केले आहे.