ठाणे (मुंबई) – भाजपा आमदार राम कदम यांनी मुलीं विषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार आंदोलन केले. यावेळी राम कदम यांच्या छायाचित्रांना काळे फासून ते जाळण्यात आले. या आंदोलनात महिला आणि युवती मोठया संख्यने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, राम कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत राम कदम यांना ठाण्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. ’एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,’ असं राम कदम दहीहंडी उत्सवात बोलताना म्हणाले होते. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आमदार राम कदम यांच्या फोटोला काळं फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्त केला.
या वेळी आनंद परांजपे म्हणाले की, राम कदम यांनी सदरचे विधान करुन त्यांनी आपण भाजपमधील रावण असल्याचे दाखवून दिले आहे. अशा माणसाचा राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे. ते जोपर्यंत जाहीर माफी मागत नाहीत. तोपर्यंत त्यांना ठाण्यात पाय ठेवू देणार नाही; तसेच, सरकारनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/06/img_20180529_134443.jpg
https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg