रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस
ठाण्याच्या विकासाला नवसंजीवनी देण्याचं काम महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.आणि पुढे ही विकासाची ही संजीवधारा अविरतपणे सुरु राहील यात ठाणेकरांच्या मनात तिळमात्र शंका नाही.
ठाणे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक देणगी लाभलेलं एक शहर. ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका हा प्रवास खूप रंजक आहे.या कालावधीत बऱ्याच सनदी अधिकाऱ्यांनी या पालिकेचा कारभार हाताळला.१२ जानेवारी २०१५ रोजी संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. आणि ठाणे महापालिकेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली, हा नव्या अध्याय आहे संजीव जयस्वाल या कर्तव्यदक्ष सनदी अधिकाऱ्याने केलेल्या न भुतोनभविष्यती अशा विकास कामाचा. ठाणे महापालिकेचा विकास याधीही होत होता पण आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या पदाचा कारभार हाती घेतला आणि शहराचा चेहरा बदलायला सुरुवात झाली.महापालिका आयुक्त या जबाबदार पदावर कार्यरत असताना सामान्य नागरिक आणि सन्मानीय पदाधिकारी यांच्यातील दुवा बनून त्यांनी नियोजित विकास आराखड्यातील कामाला सुरुवात केली. या विकास कामात नागरिकांनी कधी कौतुक केले तर काहीवेळा विरोधही केला पण कोणत्याच गोष्टीला न जुमानता विकासाचा रथ हा सुरूच ठेवला. गेल्या ४ वर्षात महापालिका आयुक्तांनी केलेल्या विकास कामाचा एक संक्षित आढावा.
ठाण्यातील भिंतीचे बोलके चित्र
ठाणे शहरातील अनेक वास्तू या चित्रविचित्र पाहायला मिळत होत्या.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंती गुटखा, पान तंबाखू खावून रंगवलेल्या पाहायला मिळत होत्या.हीच नेमकी गोष्ट महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हेरली आणि ‘ भिंती रंगवा, ठाणे सजवा” हा अभिनव उपक्रम मिझेल रुबेला या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे राबविला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि स्थानिक कलाकारांच्या कुंचल्यातून ठाण्यातील भिंती बोलू लागल्या.संपूर्ण भिंती सजीव झाल्या.शहरातील अनेक भिंतींवर हा कला आविष्कार आज नागरिकांना पाहायला मिळत आहे.
अंतर्गत जलवाहतुकीचे ठाणे:
जलवाहतूक प्रकल्पाबरोबरच ठाणे महापालिकेने वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटलाही सुरुवात केली आहे.यामध्ये साकेत,बाळकुम,कळवा शास्त्रीनगर,पारसिक रेतीबंदर,कोपरी कोलशेत,नागला बंदर,कावेसर वाघबीळ या सात क्षेत्राचा समावेश आहे.या प्रकल्पामध्ये मनोरंजन सुविधाचा देखील यामध्ये समावेश आहे.
स्मार्ट सिटी
केंद्र सरकारने देशातील निवडक शहरांचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये केला आहे.या काही निवडक शहरात ठाणे शहराचा समावेश असणे म्हणजे ठाणेकर नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.ठाणे शहराची संपूर्ण देशभरात एक वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बनवालेला स्मार्ट सिटी आराखडा म्हणजे एक देणगीच म्हणावी लागेल. मेट्रो रेल्वे , टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखा उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा, तलावांचे सुशोभिकरण, आर्कषक एलईडी लाईट्स, न्यूयार्क च्या धर्तीवर ३५ एकर जागेत सेन्ट्रल पार्क ,जेष्ठासाठी विरंगुळा केंद्र काम करणाऱ्या महिलासाठी वसतिगृह,बहुमजली पार्किंग सुविधा, बहुस्तरीय वाहतूक सुविधा , पादचारी पूल, क्रीडा सुविधा , सायकल लेन, भुयारी गटारे, मलनिःसारण केंद्र पाणीपुरवठा आणि अनेक मुलभूत गोष्टीचा या आराखड्यात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी समावेश केला आहे .
ठाणे स्मार्ट सिटी नियोजनात क्षेत्राधारित विकास,पुर्नविकास तसेच पॅनसिटी सोल्युशन यांचा समावेश करण्यात आला आहे क्षेत्राधारित विकासामध्ये ठाणे रेल्वे स्टेशन परिसर,नौपाडा,पाचपाखाडी,खारकळ,आळी, उथळसर या भागांचा समावेश असून यामध्ये सॅटीस(ठाणे पूर्व),स्टेशन परिसर,नौपाडा,पाचपाखाडी,खारकळ,आळी, उथळसर या भागांचा समावेश असून यामध्ये सॅटीस(ठाणे पूर्व), वॉटर फ्रंट(ठाणे स्टेशन ते कळवा ब्रीज),मेंटल हॉस्पिटल नजीक नवीन स्टेशन तसेच संपूर्ण क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा व सौरउर्जा प्रकल्प यांचा अंतर्भाव आहे.या विकास आरखड्यामध्ये वागळे इस्टेट परिसर, किसननगरचा समावेश आहे. पॅन सिटी सोल्युशनमध्ये वायफाय, स्मार्ट मिटरिंग,डीजी कार्ड, सीसी टी.व्ही,बस करिता आयटीएमएस या गोष्टीचाही समावेश करण्यात आला असून क्षेत्राधारित विकासाकरिता ५२३५ कोटी तर पॅनसिटीकरिता १६९ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेने स्मार्ट लेक फ्रंट सुद्धा विकसित केले आहे.यामध्ये कमल लेक फ्रंट व हरियाली लेक फ्रंट या दोन लेक फ्रंट चा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.याशिवाय शहरात सीसीटीव्हीचे जाले देखील उभारण्यात आले आहे.ठाणे शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ट्राफिक इम्प्रुव्हमेंट्स स्कीम देखील पालिकेने तयार केली आहे.संपूर्ण ठाणे शहरात मोफत वाय फाय सुविधा देण्यात आली आहे.शहरात बायो डायव्हर्सिटी पार्कचे पीपीपी तत्वाच्या माध्यमातून काम सुरु आहे.आयटीएमएस ,ईआरपी, एलईडी स्ट्रीट लाईट, पेडेस्ट्रीयन इम्प्रुव्हमेंट्स,नालाबांधनी इत्यादी प्रकल्पांचे कामकाज सुरु आहे. सोलर रुफटॉप,अर्बन रेस्ट रूम,ऑनलाईन परर्फोर्मन्स मॉनिटरिंग आदी प्रकल्पदेखील सुरु करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत विविध महत्वकांक्षी प्रकल्प राबविले जात असून ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.
डीजी ठाणे
सुनियोजित पायाभूत सर्व सुविधा,पाणी,दिवाबत्ती, वाहतुकीची सोय, आपत्कालीन सेवा, इतर सार्वजनिक सुविधा या सर्व सुविधा तांत्रिकदृष्ट्या एकत्र बांधून या सर्वांची माहिती डिजिटल स्वरुपात नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेने डीजी ठाणे ही डिजिटल प्रणाली सुरु केली आहे.महापालिका व नागरिक यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही प्रणाली महत्वपूर्ण काम करत आहे.हे अप्लिकेशन स्मार्ट फोन धारकांना डीजी ठाणे या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.या प्रणालीद्वारे नागरिकांना कला, क्रीडा,शिक्षण, वाहतूक,आरोग्यसेवा तसेच महापालिकेच्या विविध करांची माहिती एसएमएस किंवा अपच्या माध्यामातून वैयक्तिक स्वरुपात मिळते.यामुळे नागरिक सेवांची देयके, महापालिकेची मूल्यवर्धित सेवा,नागरिकांना व्यावसायिक फायदे,सरकारी सुविधा आणि शहराशी संबधित माहिती तात्काळ उपलब्ध होते.महापलिकेच्या या सुधारित डिजिटल प्रणालीममुळे ई गव्हर्नस मध्ये आमुलाग्र बदल घडत आहे.महापालिकेचे अद्यायावत संकेतस्थळ,आणि डीजी ठाणे प्रणालीमुळे नागरिकांना थेट फायदा होत आहे.
ठाणे मेट्रो प्रकल्प
शहरातील वडाळा ते कासारवडवली या अंतर्गत मेट्रोबरोबरच पीआरटीए प्रकल्प आता निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणारी वैयक्तिक वाहतूक यंत्रणा ठाणेकरांना वरदान ठरणार आहे.ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प ५ टप्प्यात राबविला राबविण्यात येणार आहे.पहिला व पाचवा टप्पा एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे.१०३ किमी लांबीच्या प्रकल्पाचा पहिला व पाचवा टप्पा मिळून एकूण ३४ किमी लांबीचा ट्रक बांधण्यात येणार आहेत.यामध्ये 60 स्थानके उभारण्यात येणार आहेत.
महत्वकांक्षी प्रकल्प :ठाणे क्लस्टर
शहरातील लोकसंख्येचा विचार करून क्लस्टर योजनेचा पुढील २५ वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या ३२ लाखाच्या घरात वाढण्याची शक्यता आहे. या लोकसंख्येचा विचार करता इतकी घरे ठाणे शहरात उपलब्ध नाहीत. शहरात सुमारे ५८ टक्के लोकांना परवडणारी घरे मिळू शकत नाहीत तर, ८ टक्के लोकांची नवीन घरे घेण्याची ऐपत नाही. सद्य:स्थितीत घरांची मागणी वाढली आहे पण जमीन उपलब्ध नसल्याने ती बांधू शकत नाहीत. क्लस्टर प्रकल्पामुळे ठाणेकरांना हक्काची घरे मिळणार आहेत
क्लस्टर योजने अतंर्गत शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.यामध्ये प्रशस्त क्रीडांगण,सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा, महिलाबचत गटांसाठी स्वतंत्र जागा, तसेच कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटर अशा अनेक आंतरराष्ट्रीय सुविधांचा समावेश क्लस्टर योजनेत असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्लस्टर योजनेसाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अथक प्रयत्नाने क्लस्टरचे काम प्रत्यक्ष सुरू होऊन ठाणेकरांचे वर्षानुवर्षांचे हक्काच्या घराचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. एकूणच ठाणे महापालिकेचा क्लस्टर प्रकल्प हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असून सर्वत्र ‘ठाणे मॉडेल’ म्हणून नक्कीच नावारूपाला येईल’
रस्तारुंदीकरण : एक महामोहीम
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंजूर विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करून ते रुंद करण्याचा एक भला प्रकल्प महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतला.बघता बघता शहरातील सर्व रस्ते रुंद आणि प्रशस्त दिसू लागले.यामध्ये अनेक अनधिकृत बांधकामे व बाधित निवासी बांधकामे तोडण्यात आली.या मोहिमेला बराच विरोधही झाला पण कोणत्याच गोष्टीला बळी न पडता आयुक्तांनी आपली ही मोहीम सुरूच ठेवली आहे. उन्हातान्हाची तमा न बाळगता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन त्यांनी केलेली ही रस्ता रुंदीकरण मोहीम नक्कीच वाख्यन्याजोगी आहे.या मोहिमेतील बांधितांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काच्या घरची सोय त्यांनी केली. रस्तारुंदीकरण करताना त्यांनी संपूर्ण महापालिका क्षेत्राचा विचार केला. पोखरण रोड नं . १ व २, शास्त्रीनगर,वागळे इस्टेट, घोडबंदर सर्व्हिस रोड, कळवा , मुंब्रा आदी अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांनी तेथील रस्त्यांचा कायापालट केला’
महापालिकेची आर्थिक स्थिती
महापालिका आयुक्तांनी ठाणे महापालिकेने आपल्या ३५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच विक्रमी वसुली करून नवीन उच्चांक निर्माण केला आहे.मालमत्ता कर, व पाणीपट्टी वसुलीची त्यांनी सुरु केलेली मोहीम १०० यशस्वी झाली आहे.काही वेळा कठोर तर काही वेळा प्रेमळ या दोन्ही धोरणाचा वापर वरून ही मोहीम प्रभावीपणे अमंलात आणली आहे. गेल्या ३ वर्षात 65 % कर वसुलीमध्ये वाढ झालेली आहे म्हणूनच महापालिकेच्या आर्थिक तिजोरी आजची ठणठणीत आहे.
चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क
वाहतुक नियम व त्याची परिणामकारकता शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरातील घोडबंदर येथील कावेसर परिसरात ‘चिल्ड्रन ट्रॅफिक’ पार्कची उभारणी केली आहे. भारतात पहिल्यांदाच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण देणारे अद्ययावत असे ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’ ठाणे शहरात उभारण्यात आले आहे.विशेषतःमहिलांसाठी दुचाकीचे मोफत प्रशिक्षणाची सोय या पार्कात महापालिकेकड़ून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीचे नियमन कसे चालते, वाहतुकीचे नियम कसे पाळावे याची माहिती शालेय विद्यार्थ्यांसह लहान मुलांना प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देण्यात येते.ट्रॅफिक पार्कमध्ये एक हजार चौ. फुट जागेत व्हर्च्युअल प्रशिक्षण कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑडिओ-व्हिडीओच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.’
अर्बन जंगल
घोडबंदर येथील कावेसर परिसरात ‘अर्बन जंगलची उभारणी केली आहे. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने 6 एकर भूखंड़ावर जवळपास 3800 वृक्षांची लागवड़ केली आहे. यामध्ये स्थानिक, दुर्मिळ, औषधी व सुगंधी अशा 50 प्रजातींच्या वनस्पतींनी हा परिसर बहरुन निघाला आहे. स्थानिक प्रजातींमध्ये कड़ुनिंब, मोहोगनी, कांचन, ताम्हण, बुच, वड़-पिंपळ आदी वृक्ष प्रजातींची येथे लागवड़ करण्यात आली आहे. तर रुद्राक्ष, हिरड़ा, बेहड़ा, सितारंजन, अर्जुन, रिठा, कैलासपती, गोरखचिंच, कवठ आदी दुर्मिळ वनस्पतींबरोबरच कमरख, पेरु, आंबा, चिकू, आवळा, नारळ, सिताफळ, सिंगापुरी केळी, जाम आदी फळझाड़ेही येथे आहेत. फुलपाखरांना आकर्षित करणा-या फुल झाड़ांचाही या अर्बन जंगल येथे समावेश करण्यात आला आहे. अर्बन जंगलच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात नागरिकांना हिंड़ण्यासाठी माती व विटांचा वापर करुन विशेष पायवाटाही येथे बनविण्यात आल्या आहेत. ठाणेकरांसाठी हा प्रकल्प एकआकर्षणाचा बिंदू ठरला आहे.
ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहेच. जिल्ह्याला समृद्ध खाडी किनारा लाभला आहे. केंद्र सरकारने अंतर्गत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी डीपीआर तयार करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर भली मोठी जबाबदारी सोपवली.आपल्या सर्व सहकार्याच्या साथीने ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. ठाणे व पालघर जिल्ह्याला समृद्ध सागरी किनारा लाभला असून जलवाहतूक सुरु झाली तर शहरी व ग्रामीण भागाचा मोठा फायदा होणार आहे. कल्याण ते वसई-विरार पर्यंत बोटीने जाण्यास ४० मिनिटे तर कल्याण-डोंबिवली दुर्गाडी किल्ल्यामार्गे मिरा-भाईंदरपर्यंत पोहोचण्यास २५ मिनिटांचा अवधी लागणार आहे. शहरातील नागरिकांना रेल्वेमार्ग, बस मार्ग, रिक्षा मार्ग आणि मेट्रो मार्ग याबरोबर सागरी मार्ग वाहतूक साठी उपलब्ध होणार आहे. या जल वाहतुकीमुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.